रविवार, २८ ऑगस्ट, २०११

सेंटर हिल लेक ची रात्र ...

शेवटी मागच्या आठवड्या मध्ये मास्टर्स चा डिफेन्स झाला आणि आयुष्य परत ब्लोग्गिंग च्या रुळावर आले...थोड्या पार्ट्या आणि नंतर चा आराम (त्याला इंग्लिश मध्ये hangover म्हणतात !) झाल्या वर आज लिहायला बसलो...(तसा मागचा महिना thesis लिहून लिहून डोक्याची मंडई झाली होती !)

दीड महिन्यापूर्वी कुक्वील च्या जवळच्या एका सरोवारची रात्र सहल झाली होती....आमच्या मधले सगळे फोटोग्राफर वीर त्या center hill lake ला हजर होते...गौतम च्या नवीन कॅमेराचे उद्घाटन पण करायचे होते... तसा हा center hill lake एका धरणामुळे तयार झाला आहे...त्याचे ६५ मैल नुसते पाणी म्हणजे वेड लागायची पाळी...!

संध्याकळी पोचलो तिकडे... "संधी प्रकाश" काय मस्त नाव आहे ना ..फोटो काढण्यासाठी निसर्गाने दिलेली अप्रतिम "संधी"...!


माझे न्यूयॉर्क-कालीफोर्नियाचे मित्र त्यांच्या इकडच्या Hummer-Ferrari च्या गोष्टी मला सांगतात...पण हा फोर्ड चा जुना ट्रक मला जास्त भावतो... असे ट्रक आणि ते चालवणारे कंट्री आजोबा यांचे एक गुढ नाते असते ते नव्या गाड्यामध्ये मला कधी दिसले नाही..


अंतरंगात घेऊन जाणारा आणि खोलीचा अंदाज न देणारा हा पूल...एखाद्या जवळच्या मैत्रिणीच्या मनासारखा...!


हा माझा मित्र गुगल उर्फ श्रीसागर ...फोटोग्राफी चा माझ्या सारखा वेडा...आमच्या वेड्यांचे स्वतःचे फोटो कोणीच काढत नाही..
आणि कोणाला हौस पण नसते...पण कधीतरी फेसबुक च्या भुकेसाठी आम्ही असे एखाददुसरे स्वतःचे अजरामर फोटो काढतो... ;)


रात्र झाली आणि मग आमचे चालू झाले फोटोग्राफीचे प्रयोग (तिकडे पण संशोधन तिच्या मायला !) कॅमेरा tripod वर लावला...गुगल चा SLR असल्याने अमर्यादित शटर स्पीड मिळाला... Motorola Attrix mobile फोनचा उपयोग torch सारखा केला आणि विविध आकार तयार केले....खूप कष्टामधून एक पद्धत सापडली आणि मग फुल धमाल !

हा मीच आहे...इंजिनियर फक्त डोक्याने विचार न करता मनाने पण विचार करतात...आणि जेंव्हा करतात तेंव्हा त्याचा परिणाम खालचा फोटो असतो...


हा गौतम माझा प्रोफेसर मित्र....Mathematics Modeling मध्ये खेळणारा ...त्याला आम्ही आमच्या केमिकल संयुगामध्ये कैद केले....


गणपती कुमार ...खूप विचारी आणि अवकाश संशोधन हा त्याच्या छंद !


The Batman ..गुगल उर्फ श्रीसागर ....कुठली पण गोष्ट विचारा आणि कधी पण विचारा २ सेकंदामध्ये उत्तर मिळते अशी त्याची ख्याती...

मी, श्रीराम आणि गुगल...आमच्या युनिवर्सिटी वर जीवापाड प्रेम करणारी लोक....Tennessee Tech University ला (TTU) ला शेवटी आम्ही आमच्या डोक्यावर बसवले...


(हे शेवटचे long exposure चे फोटो श्रीसागर,गणपती,मी,गौतम,श्रीराम आणि पद्मनाभनकुमार यांनी मिळून काढले आहेत .)












शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०११

आधी बदल आपल्यात.. नंतर आंदोलने..

देशभर उसळलेले अण्णांचे आंदोलन, कार्यकर्त्यांची उपोषणं या आत्ताच्या उफाळलेल्या विषयांवर परवा दुपारी ऑफिसमधे चर्चा चालू होती. बालगंधर्व चौकात ऑफिसनंतर कोण कधी जाणार यावर सगळे बोलत होते. बोलता बोलता प्रत्येकाचे या धर्तीवरचे विचार समोर येत होते. पण त्यात शर्वरी एका विषयावर घवघवून बोलली. आपल्याप्रमाणे अजून कोणीतरी हा विचार करतं ऐकून मला मनोमन बरे वाटले. आधी कधीच या विषयावर लिहिले नाही पण आज गरज आहे कोणीतरी हे बोलायची, किंवा प्रत्यक्षात अमलात आणण्याची.

एका व्यक्तीच्या नेतृत्वाखाली आज जनता सरकार विरोधात उभी ठाकली आहे. आजचा लढा भ्रष्टाचार विरुद्ध असला तरी त्यात आपण सामील व्हायला कितपत योग्य ठरतो हा देखील विचार करणे गरजेचे ठरते. दुसऱ्यावर बोट दाखवणे सोपे असते असं सगळेच म्हणतात. एवढ्या मोठ्या संख्येने आज एक लढाई लढली जात आहे. एक चांगला मोठा बदल घडवून आणण्याआधी दिवसातल्या ज्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी डावचून आपण पुढे जातो प्रथम त्यात सुधारणा आणणे आपले कर्तव्य आहे. सरकारच्या भ्रष्ट वागणुकीच्या विरोधात जाण्यापूर्वी त्याच सरकारने आपल्यासाठी जे नियम केले आहेत ते आपण कितपत पाळतो याची दखल जरी प्रत्येकाने घेतली तरी खूप आहे.

कित्येक साध्या साध्या गोष्टी. सिग्नल हिरवा झाला की पुढे जावे आणि लाल झाला की थांबावे हे इयत्ता पहिलीत शिकवून पण इतक्या वर्षानंतर गाडी पुढे कधी काढली जाते काळत नाही. पादचारी सिग्नल लाल असतानादेखील भरधाव येणाऱ्या गाड्यांसमोर रस्ता पार करणे आणि वर त्यांच्यावर ओरडण्यात काय अर्थ आहे. दुभाजकाचा उपयोग ट्राफिक जास्त असताना त्याच्या दुसऱ्या बाजूने गाडी सगळ्यांच्या पुढे काढण्यासाठी असतो की काय?  त्याच वेळी समोरून येणाऱ्या गाड्यांना आपल्यामुळे पुढे जाता येणार नाही आणि सगळाच ट्राफिकचा खोळंबा होईल हे स्वतःहून कधी उमगणार?

सणवारांना, नेत्यांच्या जयंत्याना मोठमोठे स्पीकर लावून बेधुंद नाचून, मिरवणुकीतून ट्राफिक अडकवून, आवाजाचे प्रदूषण करण्यात काय मजा आहे? गरज नाही तिथे मोठमोठ्याने हॉर्न वाजवून, अतिवेगाने गाड्या हाकण्यातली मस्ती त्यांच्या नाही पण एखाद्याच्या जीवावर बेतू शकते हा समंजसपणा कधी येणार. आजकाल जो नियम पाळत गाडी चालवतो तोच ठोकला जातो असे माझे स्पष्ट मत आहे. दिमाखदार गाड्यातून फिरणाऱ्या लोकांना खिडकीतून बाहेर कचरा टाकणे, सिगरेट फेकणे यात काय मोठेपणा गाजवायचा असतो? वर शांतपणे कधी ह्यांना सांगायला गेला तर फुकटचे उपदेश केल्या सारखं दुर्लक्ष केलं जातं. चुकून सिगरेटची एखादी राखेचा कण मागच्याच्या नाकाडोळ्यात गेला तर चेकने नुकसान हे लोक भरणार का..!!

गाड्यांना सामान, पर्स ठेवण्यासाठी शिस्तीत जागा दिली असताना त्या खांद्यावर लटकवून भर ट्राफिकमधे चोरांना आमंत्रणे आपण बायकांनीच द्यायची आणि नंतर ती पळवून नेली की आरडाओरडा देखील आपणच करायचा.. बस, रेल्वे मधे खिडकीबाहेर कचरा टाकू नका सांगितला तर दुसऱ्या बाजूच्या खिडकीतून बाहेर फेकणारे लोक पण कित्येक बघितले. गाडीत खाली ठेवला तर काय बिघडला. गाडी रोज तरी स्वच्छ होते, बाहेरचा निसर्ग स्वच्छ करणारे कोणी पाहिलेत का. पेट्रोल ऑईल घेताना ५०-५० पैशाने पण नफा कमवणारे कामगार तो पैसा आपल्या खिशात घालतात आणि आपण बिल न घेता तो सरकारच्या म्हणजेच आपल्याच tax मधून आलेल्या शेवटीच आपलाच पैसा सहज त्यांच्या हवाली करतो.

मोठमोठ्या जाहिरातींचे, नेत्यांच्या वाढदिवसांच्या शुभेच्छांचे फलक लावायला सिग्नलच्या समोरची जागा मिळावी की सिग्नलच दिसू नये? निरनिराळे चौकात पुतळे बांधण्यापेक्षा त्याच पैशांचा अजून चांगल्या अर्थाने वापर होऊ शकतो. रात्री जाहिरातींवरचा झगमगाट थोडा कमी झाला, आपल्या घरातले साधे वाशिंग मशीन एक दिवसाआड लावले तरी कित्ये किलोवॅट वीज वाचेल. दुकानात प्लास्टिक पिशवीवर बंदी आहे तरी जास्तीचे ५ रुपये भरून ती घ्यायला लोक तयार असतात. प्रथम आपण आपली न्यायला काय वजन पडतं आणि आपण जास्त पैसे भरतोय तर मग ती recycle करता यावी हा अट्टाहास का नसावा? एक-दोन रुपयांच्या सुट्ट्या नाण्यासाठी भांडण्यात काय अर्थ आहे. कॉम्पुटरवर काम झालं की स्क्रीन बंद केला तर काही बिघडत नाही. लहान तोंडी मोठा घास घेऊन मोठ्यांना या गोष्टी सांगितल्या तर त्या चांगल्या आहेत तरी पटत का नाही याचे नवल वाटते. मागच्या आणि आत्ताच्या पिढीच्या चुकांमुळे आपली पुढची पिढी त्रासात जगणारे जाची जाणीव सगळ्यांना कधी होणार?

अशा कित्येक साध्यासुध्या गोष्टी आहेत. आपण त्या बदलायच्या की नाही हा विचार स्वतःपासून सुरु करू शकतो. "Its a common human tendency to follow the least resistance." असे एकदा आमचे प्रोफेसर humanity च्या लेक्चरला बोलून गेले होते. पण एक मोठा बदल धडवून आणण्याच्या आंदोलनाआधी तो बदल स्वतःत घडवून आणण्याचा निर्णय प्रथम घेतला गेला पाहिजे. मग नंतर येतात सामाजिक  लढे. शेवटी नेते पण आपल्यातलेच एक निवडून आले आहेत. तेव्हा मित्रहो आज सरकार विरुद्ध जाताना एकदा रात्री झोपण्याआधी ५ मिनिटे तरी याचा देखील जरूर विचार करून बघा.....!!

सोमवार, १५ ऑगस्ट, २०११

Cokestudio.pk



शनिवारी सहज जेजेतल्या एका मित्राशी बोलताना विषय निघाला कोकस्टुडीओचा.. आर्किटेक्चरच्या शेवटच्या वर्षाला असताना माझ्या एका खूप जुन्या मित्राने सहज ऑनलाइन या प्रोग्रामबद्दल सांगितले होते. प्रथम एक लिंक देऊन नंतर थोडी फार माहिती सांगितली. त्या एका गाण्याने एवढे वेड लावले दुसऱ्या दिवशी कॉलेजनंतर २ तासात सगळे एपिसोड्स डाउनलोड केले आणि एका आठवड्यात behind the scenes सकट सगळे बघून झाले होते.

कोकस्टुडीओ खरं तर पाकिस्तानी सिरीज आहे. क्लासिकल पासून कंटेंपररी पर्यंत नवोदित व रुजलेल्या कलाकारांना घेऊन रेकॉर्ड केलेले लाइव्ह फ्युजन सेशन्स. सुरवातीला टीव्ही आणि रेडियोवर प्रसारण व्हायचे. हळू हळू लोकप्रियता वाढली तसे वेबसाईट http://www.cokestudio.com.pk/ , फेसबुक, युट्युबवर जगभर सर्वांना बघण्यास उपलब्ध झाले. वेबसाईट वर सगळ्या एपिसोड्सचे ऑडिओ, विडीओ आणि behind the scenes(BTS) बघायला मिळतात. BTS बघितल्याने त्या गाण्यावर काय नाविन्य आणि मेहनत घेतली आहे अशा प्रत्येक detail कडे लक्ष जायचे. 2008 पासून सुरु झालेला हा प्रोग्राम दिवसेंदिवस अधिकाधिक श्रोते खेचतो आहे. लाल, काळा, पांढरा अशा bright रंगातला सेट पहिल्या झटक्यात लक्ष वेधून घेतो. band मधले सगळे artist उत्तमोत्तम वाजवण्याचा प्रयत्न करतात. आत्तापर्यंत कोकस्टुडीओ (पाकिस्तान)चे चार सिझन्सचे शुटींग झाले आहे. पहिले तीनही एपिसोड्स वेबसाईटवर उपलब्ध आहेत. चौथा आत्ताच आल्याने हळू हळू येईल.

पाकिस्तानी संगीत आपल्या अरेबिअन, अफगाणी पासून राजस्थानी हद्दीजावालच्या संस्कृतीची छाप मनावर सोडून जाते. झेब आणि हानीया या दोन मुली कमाल करतात. हिंदी पेक्षा त्यांची अफगाणी व अरेबिअन गाणी 'बीबी सनम जानम, अनार सिस्तानम् (My love, you are like the sweet pomegranate of Sistan) http://www.youtube.com/watch?v=kksSpCqM1No&feature=related, पैमोना बिदे की खुमार अस्तान (Bring me the glass so I may lose myself)'  http://www.youtube.com/watch?v=QTzHJH1iv30पहिल्यांदा भाषा कळली नाही तरी परत परत ऐकावीशी वाटतात. नझार आईले नझार आईले, गिल यानामा पाझार आईले (Look at me… Look at me… Gather around and we will make it a lively bazaar ) http://www.youtube.com/watch?v=yvLv2-A0mnc गिटारने केलेली सुरवात आणि इतर गाण्यांहून पूर्ण वेगळे असे '5 beats' चे तुर्की गाणे, instruments वर समजायला अवघड पण तेवढेच कायम गुणगुणावेसे वाटते. त्यांचे जावेद बाशीर बरोबरचे पूर्णतः क्लासिकल 'चल दिये' http://www.youtube.com/watch?v=Zz78R2rCOvE&feature=related गाण्याचे बोल आणि मांडणी प्रेमात पडलेल्याला परत प्रेमात पाडेल.

फ्युजन चा कळस म्हणजे नुरी ब्रदर्स. सतार आणि रॉकचे अफलातून जादू ऐकायला मिळते 'किदारhttp://www.youtube.com/watch?v=HYlFzD5MCrI आणि 'सारी रात' http://www.youtube.com/watch?v=-S5U2GXKBSo गाण्यात..! दोन्हीमध्ये गम्बी याने जीव खाऊन ड्रमसेट बेक्कार बडवला आहे. आणि याच्या उलट एकदम शांत स्वरूपाचे 'होर वी निवान होhttp://www.youtube.com/watch?v=qUcaCYx0kzI&feature=related गाणं हे भाऊ आई वडिलांबरोबर सादर करतात ते पण तेवढंच उच्च..
राहत फतेह अली खान क्लासिकल 'गरज बरसhttp://www.youtube.com/watch?v=2iTDaBXsLhM&feature=related चालू करतो आणि अली अझमत पुढे भाव खाऊन जातो. strings आपली नेहमीची गाणी सादर करून शांत बसले आहेत पण त्यात देखील 'सरकिये, तीतलीया, झिंदा' मस्त जमली आहेत. अबिदा परवीनचे 'रमुझ-ए-इश्क़ (में हू माशहूर)'  ऐकल्यावर एका वेगळ्याच विश्वात पोचल्यासारखे वाटते. सारेगामापा विनर अमानत अली इंग्लिश मधले 'आयेशाhttp://www.youtube.com/watch?v=iJJYdY-9U-w&feature=related हिंदीत सुरेख सादर करतो. त्याच्या घोगऱ्या आवाजातले 'ए वतन के सजीले जवानोhttp://www.youtube.com/watch?v=VXQzzJZXcYc सरळ काळजात घुसते. आतिफ अस्लमचे 'जल परी http://www.youtube.com/watch?v=zmLp3PC71vE&feature=related आणि किनारा' http://www.youtube.com/watch?v=TXGTA3X99g0 आत्तापर्यंत त्याचे best performance असतील.

या सगळ्यात मनाला भिडणारा आवाज म्हणजे शिफाकत अमानत अलीचा. 'आखोके सागरhttp://www.youtube.com/watch?v=I7xqX51zqoM&feature=related आणि 'खमाज' http://www.youtube.com/watch?v=uMF8npZN5wE&feature=related ऐकताना आपोआप डोळे बंद होतात. ओरीजीनल ऐकावेसे वाटत नाही इतका सुरेख मेकओव्हर एखाद्या गाण्याचा पहिल्यांदाच ऐकायला मिळाला.

'नैना दे आंखे लग गये, रोना छोड दिया, इक आलीफ, कुछ अजब खेल, जो मेरे, चूप' अशी अजून कित्येक गाणी कोकस्टुडीओ गाजवतात. ही लोकप्रियता बघून Mtv ने कोकस्टुडीओ भारतात आणले. आपल्या वेगवेगळ्या भाषा, त्यांच्या निरनिराळ्या शैलीतली गाणी आणि यात फुजन तर अजून विविधता आणेल..हळू हळू आपल्या नवनवीन आणि दिग्गज कलाकारांना ऐकायची संधी मिळणार आहे आणि नेहमीप्रमाणे कोकस्टुडीओ आपल्या मैफिली अशाच रंगवत राहील हे नक्कीच..

रविवार, १२ जून, २०११

आज शेवटी पोस्ट लिहायचा मुहूर्त सापडला....सेमिस्टर संपली तसा मी भारतात १ महिना जाऊन आलो....आधी विचार होता कि तिकडे जाऊन एखादे तरी पोस्ट टाकावे...जे कुकविले मध्ये करतो ते पुण्यात करून काय फायदा असे म्हणून टाळले गेले....एकडे टेनेसीला आल्यापासून मास्टर च्या थेसिस ची गडबड चालू झाली त्यामुळे त्यात १ आठवडा गेला....खूप फोटो काढले होते ते शेवटी सांगयला लागले कि बाबा आत्ता तरी आम्हाला पोस्ट कर...!

भारतात पहिल्यांदा गेलो त्यामुळे जास्त भटकंती केली नाही....फक्त एकदा मुंबई ला गेलो....तसा म्हणता माझा जन्म ठाण्याचा (म्हणजे अर्धा मुंबईकर)पण अशी मुंबई ती फिरणे झाले नव्हता...नशिबाने सायलीला मुंबई युनिवर्सिटी चे काम निघाले तिच्या बरोबर माझी स्वारी निघाली... सायली म्हणजे मुंबई ची चालतीबोलती मार्गदर्शक....कुठे काय सही खायला मिळते त्यापासून कुठली इमारत कितीसाली कोणी बांधली (स्थापत्य शास्त्राची पदवीधर ते पण जे.जे मधून !)याची तिला बेक्कार माहिती....त्यामुळे सकाळी दादर -कुलाबा -सांताक्रूझ-कुर्ला-जेजे असे मुंबई दर्शन झाले...त्यात माझा कॅमेरा आणि तिचे तोंड कायम चालू होते (फोटो मध्ये आवाज रेकॉर्ड व्हायला पाहिजे होता ...)







जीवाची मुंबई ...उन्हाळ्यात ती पण माझ्या कॅमेरात !

आज शेवटी पोस्ट लिहायचा मुहूर्त सापडला....सेमिस्टर संपली तसा मी भारतात १ महिना जाऊन आलो....आधी विचार होता कि तिकडे जाऊन एखादे तरी पोस्ट टाकावे..."जे कुकविले मध्ये करतो ते पुण्यात करून काय फायदा" असे म्हणून टाळले गेले....एकडे टेनेसीला आल्यापासून मास्टर च्या थेसिस ची गडबड चालू झाली त्यामुळे त्यात १ आठवडा गेला....खूप फोटो काढले होते ते फोटोच शेवटी सांगयला लागले कि बाबा आत्ता तरी आम्हाला पोस्ट कर...!

भारतात पहिल्यांदा गेलो त्यामुळे जास्त भटकंती केली नाही....फक्त एकदा मुंबई ला गेलो....तसा म्हणता माझा जन्म ठाण्याचा (म्हणजे अर्धा मुंबईकर !)पण अशी शांतपणे मुंबई ती फिरणे झाले नव्हते ...नशिबाने सायलीला मुंबई युनिवर्सिटी चे काम निघाले तिच्या बरोबर माझी स्वारी निघाली... सायली म्हणजे मुंबई ची चालतीबोलती मार्गदर्शक....कुठे काय सही खायला मिळते त्यापासून कुठली इमारत किती साली कोणी बांधली (स्थापत्य शास्त्राची पदवीधर ते पण जे.जे मधून !)याची तिला बेक्कार माहिती....त्यामुळे सकाळी दादर -कुलाबा -सांताक्रूझ-कुर्ला-जेजे असे मुंबई दर्शन झाले...त्यात माझा कॅमेरा आणि तिचे तोंड कायम चालू होते (अजूनही मला फोटो बघताना तिचा आवाज ऐकू येतो....;))


दक्षिण मुंबई मध्ये रस्त्यवरून फिरताना अनेक जुन्या इमारती लक्ष वेधून घेत होत्या....मी तर किती तर वेळ वेडा होऊन बघतच बसलो होतो....प्रत्येक इमारतीचा एक इतिहास होता तरीसुद्धा त्या वर्तमानाला तोंड देत उभ्या होत्या....अगदी जुन्या पारशी बाबा सारख्या,...



मधेच ही १०० कोटी ची इमारत दिसली....एकदा माझ्या एका अमेरिकन मित्राला मी त्याबद्दल सांगत होतो (तेंव्हा मला त्या इमारतीचा फुल अभिमान वगैरे वाटत होता !)तो म्हणाला "असेल १०० कोटीची पण याचा तुमच्या देशातील सामान्य लोकांना उपयोग काय..?" माझ्या कडे काहीच उत्तर नव्हते...



या किल्ल्यावाल्याकडे बघून मला एक नेहमी प्रश्न पडतो कि "हे कुठली पण किल्ली बनवू शकतात मग चोरीचे-घरफोडीचे विचार करत असतील का ?" पण बहुतेक त्यांनी पण स्पायडरमॅनचे बोलणे ऐकले असणार "great power comes with great responsibility !"



हा आहे दादरचा कबुतरखाना ! माझी आई दादरची ..तिचे सगळे बालपण शिवाजीपार्कच्या समोर केशवभुवन मध्ये गेले...त्यामुळे दादर मधून जात असताना "आई एकडे लहानपणी गेली असेल का ?"या विचाराने मला वेडावून सोडले होते...




माझी आई बँक ऑफ इंडिया मध्ये २५ वर्षापेक्षा जास्त नोकरी करते आहे....तिच्या साठी हा फोटो काढून आणला कारण याच इमारती मधून तिने कॉलेजनंतर नोकरी चालू केली होती...



या इमारतीचे दगड म्हणा किंव्हा texture म्हणा मला मोहून टाकत होते....माझी अन्न्दाती बँक म्हणून फोटो सहज खपून जाईल....



Taxi मधून ५० kmph ला काढलेला फोटो येवढा चांगला येईल असे वाटले नव्हते....हाजी-अली चा दर्गा !



हा फुटपाथ आहे या वरती माझा आधी विश्वासच बसत नव्हता....आत्ताच्या काळात पण रस्ते वाढवण्याच्या क्रेझ मध्ये पण तो टिकून राहिला हेच मुंबई चे वैशिष्ट्य आहे...




"लव्ह केलिये साला कुच भी करेगा !" वरळी सी-लिंक



क्रॉफर्ड मार्केट ....एवढ्या गर्दी गोंधळा मध्ये मी शांत झालो आणि click केले...आकाश पण सही होते आणि कॅमेराने पण साथ दिली..



१८६३ मध्ये हे वाचनालय चालू झाले...David Sassoon याने त्याकाळी ६०००० रुपयाची देणगी दिली म्हणून हे वाचनालय उभे राहिले...मुंबई चा हा असा इतिहास तिथल्या लोकांमुळे कधी इतिहास वाटलाच नाही...




सायलीने माहिती पुरवली जे डावीकडे दिसते आहे ते वाटसन होटेल आणि उजवी कडचा राजाभाई टॉवर ...आणि मी direct १५ वर्ष मागे पोहचलो....बाबा मला मुंबई दाखवायला घेऊन यायचे "राणीचा बाग,prince of wales museum,म्हातारीचा बूट, getway of India असे करत आम्ही बेस्ट मधून मुंबई फिरायचो..

गंधर्व .. !!

महिन्याच्या दुसऱ्या शनिवार-रविवारची मला सुट्टी असल्याने आज बाबांनी देखील रजा घेतली. सकाळी उठल्यावर गप्पांमध्ये दिवसाचे आराखडे होता होता एक महिना झाला  घरच्यांबरोबर बघायचा ठरवलेला "बालगंधर्व" सिनेमाला जायचं ठरलं. गरम मिसळ आणि दुपारच्या पडीनंतर ५.३० च्या खेळाची तिकीटे काढली. आम्ही बरेच आधी पोचल्यामुळे आमच्या गप्पांमधून पण लोकांच्या गप्पांकडे लक्ष जात होतं. अगदी " family movie" आहे हो, बघितलाच पाहिजे असे म्हणत बरेच तिथे जमले होते.

बाबा मुळात कलाप्रेमी असल्याने मी विषयाशी पूर्णपणे परिचित होते. इतके दिवस जेव्हा कधी विषय निघायचा तेव्हा बाबा भरभरून बोलायचे. त्यांना कुठे थांबवायचे का नाहीच असा प्रश्न आई आणि मला पडायचा. त्यांच्या डोळ्यात चमकणाऱ्या त्या कलाप्रेमाने त्या बोलण्याला अजून उठाव यायचा. घरातल्या ३०० हून अधिक संगीताच्या कॅसेट्स व त्याहून कित्येक अधिक पुस्तके वाचून जमलेला तो ठेवा मला ते देऊ पाहतात. खोलवर अभ्यास नसला तरी चालेल पण अंगातलं रसिकत्व जप असं नेहमीच ते सांगत आले. रक्ताने जोडलेले आम्ही, ही शिकवण मुरायला जास्त वेळ लागला नाही. थोडेफार गाता व synthesizer वाजवता येते पण त्यावर प्रभुत्व मिळवण्याचा मानस राहिला तो राहिलाच.

आजच्या reality shows मध्ये उठलेला कलेचा बाजार बघता मनोमन चीड येते. पण संसार चालवायचा म्हणजे लागणारा पैसा मिळवण्याचे तो एकमेव पर्याय उरल्यासारखे वाटते. डोक्याला निर्मळ आनंद देण्यापेक्षा कलकलच जास्त होते. अशावेळी आपले संपूर्ण आयुष्य रसिकांसाठी वाहून घेणाऱ्या गंधर्वांची महानता कळते की आदर वाटतो नीट समजत नाही.  भामिनीचा खानदानीपणा जपण्यासाठी तडफडणाऱ्या त्या जिवाच्या गोष्टी ऐकताना व आज सिनेमात समोर बघताना ते कलेवरचे वेडे प्रेम बघून अंगावर काटा आला. त्या वेळचे पुणे, कोल्हापूर, तो रंगमंच जणू त्या पडद्याऐवजी उभा केला होता.

दोन तास नेत्रसुख आणि भावना यात गुरफटलेल्या अवस्थेतच आम्ही स्तब्ध होतो. थिएटर बाहेर पडता पडता लोकांच्या टिपण्या परत लक्ष वेधून घ्यायला लागल्या. "काय कॅमेरा वापरलाय हो, सुबोधने काय झकास काम केलंय, मध्यंतरानंतर जरा रडवेला होता, यंदा सगळे अवार्ड सुबोध नेणार नक्की." सिनेमाच्या शेवटच्या ओळी संपायच्या  आधीच बाहेर चालू लागणाऱ्या ठकांची चीड येत होती. आम्ही २०-३० जण अजून ते जुने फोटो बघत असताना देखील ह्यांची बडबड सुरूच. हा सिनेमा केवळ एक entertainment आहे ह्यासाठी किती लोक आले होते आणि किती खरंच गंधर्वांच्या आयुष्यनाट्यात सामील व्हायला आले होते कुणास ठाऊक. सिनेमाचा पूर्ण वेळ बाजूला वेफर्स खाणारी मुले व पुढे ऑफिसमधल्या गप्पा मारणाऱ्या त्या बापाला ओरडून सांगावेसे वाटले घरी जाऊन काय ते टाळ पिटा !

घरच्यांना असलेल्या ज्ञानामुळे व रसिकत्वामुळे ह्या चित्रपटाची खोली मला जाणवू शकली. लहानपणापासून ह्या गोष्टी कानावर पडल्याने हा ठेवा ५०% का होईना मी माझ्या पुढच्या पिढीला देऊ शकते. सिनेमात केवळ एक व्यक्तिरेखा साकारून सुबोधवर नकळत कलेने कित्येक संस्कार रुजवले असतील. त्यावर तो आपले पुढचे जीवन सार्थकी लावेलाच यात शंका नाही. पण मनात विचार येतात. त्या वेफर्स खाणाऱ्या मुलाला काय कळला असेल हा चित्रपट? ऑफिसच्या गप्पात बुडालेल्या त्या आईवडलांना सिनेमाची खोलाई जाणवत नाही तर त्या पुढच्या पिढीला कुठून उमगणार. कलेचा होणारं ऱ्हास तो हाच का नकळत वाटून गेले. विद्या आणि कलेचे माहेरघर अजून किती दिवस हे जपू शकणार हा प्रश्न आहे.

घरच्यांमुळे रुजलेले रसिकत्व आज कुठे तरी सुन्न झाले. ज्या बालगंधर्वांच्या सिनेमाचा आज गाजावाजा चालला आहे त्यांचे पुण्यातले अर्धवट पडके घर अजूनही कसाबसा हा पावसाळा झेलू पाहते आहे याचे वाईट वाटते...

शुक्रवार, ३ जून, २०११

पाऊस असा रुणझुणता..

पाऊस काय सुरु झाला फेसबुक वर स्टेटस अपडेट करायला लोकांना अगदी ऊत आला.. मी पण काय त्यात कोणी वेगळी नाही. फरक फेसबुक ऐवजी फक्त ब्लॉगचा आहे. गेले काही दिवस लिहायला वेळ झाला नाही. पण आज थोडसंच का होईना पण लिहण्यावाचून राहवलं नाही.

साडेचार वर्षानंतर आज पुण्यातला पाउस अनुभवतेय. साईट वर जाताना सर बोलून गेले आज पाऊस पडणार. रणरणत्या उन्हात पुणे विद्यापीठाची मंडळी आमचं काम बघायला साईटवर येणार होती. सगळं नीट पार पडलं तसे मी आणि सर ऑफिस कडे परत निघालो. तोपर्यंत ढगांनी आपले रंग बदलले होते. त्यात पाषाण रस्त्याने स्वतःचा एक नवीनच कॅनवास रंगवला होता. दोन्ही बाजूने गुलमोहोर बहरला होता. त्यात मधे मधे बोगनवेल आपल्या गुलाबी पांढऱ्या छटांमध्ये खुलून दिसत होती.

चांदणी चौक पार केला तसं समोर कोथरूड वर उठलेलं धुळीचं वावटळ दिसलं. सरांनी गाडीचा वेग वाढवला. गाडीत दोन प्रोजेक्टची कागदाची मॉडेल असल्याने त्यांना पावसापासून वाचवणं जास्त महत्वाचं होतं. गाडी ऑफिसखाली आली तसे पटापट आम्ही मॉडेल खाली उतरवले आणि लिफ्ट कडे धाव घेतली. गाडी पार्किंग मधे घातली तेवढ्यात वरचं झाड कोसळलं. पण आमची धावपळ कामी आली. आत पाऊल ठेवलं आणि समोर सगळे कागद भिरभिर उडत होते आणि खिडक्या लावायला सगळे पळत होते. गरम चहाची ऑर्डर सोडली. नंतर ओघानेच सगळी पावसाची गाणी सगळ्यांनी लावली. गप्पा सुरु झाल्या.

आपापल्या कॉलेजच्या आठवणीत सगळे रमून गेले. पहिल्या पावसाच्या प्रत्येकाच्या निरनिराळ्या कथा. कोणी सिंहगड तर कोणी लवासा, कोणी मरीन ड्राईव्ह तर कोणी खडकवासला.  गरम गरम भजी असो वा जिलबी, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी.. चिखलात फुटबॉल खेळण्याची मजा काही औरच. काहीना दुरवर भटकून येण्याची आवड तर काहीना गच्चीवर जाऊन बसण्याची आवड.

कधीतरी साचलेल्या पाण्यापासून गाडी वाचवत स्वतःला सांभाळणारे लोक तर कुठे त्याच पाण्यात उड्या मारणारी बच्चे कंपनी. चिखलातून पाय खाली न टेकवता सरळ गाडी पुढे काढायची कसरत तर कुठे दुसऱ्यावर सुर्रकन पाणी उडवून जाणारया ४ व्हीलर्स. चप्पल कमी नक्षीकाम करेल पण बाईकवाल्यांचे मागचे टायर अफाट कारंज उभे करेल.

मान्सून ट्रेकचे प्लान्स आजकाल ठरवायला लागत नाहीत. गाडी काढून मुळशी गाठायला कोणी मागेपुढे पाहत नाही. कितीही दरड कोसळली तरी माळशेज आपला दुधसागरने सर्वांना बोलावतच राहतो. कोकण रेल्वेचा प्रवास फक्त निसर्गदर्शनासाठी केला जातो. कितीही उसळल्या लाटा तरी समुद्राकडे जाववून राहवत नाही.

पावसाकडे शून्यात बघत जुन्या आठवणी ताज्या होतात. पाऊस असा रुणझुणता.. सलीलचे गाणे साद घालते.. हिंदी मराठी इंग्लिश सगळी पावसाची romantic गाणी playlist मधे आपली जागा बनवतात.

आणि यात ऐन पावसात महानगरपालिका रस्त्यांची कामं काढणार. परत आता रस्त्यावर खड्डे वाढणार, चिखलात चाक फसणार, विजा कडकडणार,झाडं पडून खांब पडणार, तासन तास लाईट जाणार, कामाच्या वेळी धो धो वरुणराजे कोसळणार, रेनकोटची बटनं टिकणार नाही, ओल्या कपड्यांमधेच काम करायला लागणार, गाडीचे ब्रेक तर लागणारच नाही, पाणी साचून वाहतूक ठप्प होणार.. सरासरीपेक्षा कमीजास्त पाऊस पडणार, हवामानखात्याचे अंदाज नेहमीच चुकणार, कुठे पूर तर कुठे कृत्रिम पाऊस, चिकचिक कधी संपणार नाही.

वर्षोनुवर्षे चालणारे तेच कधीही न बदलणारे चित्र, कितीही वेळा रंगवले तरी बदलणार नाही..